निपाणी व चिकोडी तालुक्यातील स्थिती ः उद्दिष्ट पूर्तीसाठी होणार दमछाक
निपाणी ः बेळगाव जिल्हयातील विविध साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आता जोमाने सुरू झाला आहे. निपाणी व चिकोडी तालुक्यातील साखर कारखान्यांना नजीकच्या महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे आव्हान आहे. नजीकच्या महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडून निपाणी व चिकोडी तालुक्यातील उसाची मोठ्या प्रमाणाात तोड केली जात आहे. या साखर कारखान्यांनी ३४०० पेक्षा अधिक दर जाहीर केला आहे. त्या तुलनेत निपाणी व चिकोडी तालुक्यातील कारखान्यांनी ३३५० ते ३३६० रूपये दर देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे उद्दिष्ट पूर्तीसाठी तालुक्यातील कारखान्यांना मोठा प्रयत्न करावा लागणार आहेे.
हाल शुगर व जैनापूर येथील अरिहंत साखर कारखान्याला मशिनरी चालू होण्यास थोडा विलंब लागला. महाराष्ट्रातील छत्रपती शाहू साखर कारखाना, सदाशिवराव मंडलिक कारखाना व संताजी घोरपडे साखर कारखान्यांनी गेल्या महिन्याभरात अधिक तर उसाची उचल केेली आहे. तसेच जवाहर साखर कारखाना, दत्त साखर कारखाना, पंचगंगा कारखाना आदी साखर कारखान्यांंचे कार्यक्षेत्र हे कर्नाटक हद्दीला लागून आहे.
यावर्षी कर्नाटक सरकारने ३० ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याची मुभा दिली होती. परंतु कर्नाटकातील ऊस उत्पादकांनी उसाला दर जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू देणार नाही, अशी भूमिका घेऊन आंदोलन केले. निपाणी सीमा भागात देखील ऊसतोडणी वाहतूक रोखण्यात आली. त्यामुळे या आंदोलनाची दखल सरकारने घेऊन उसाला ३३०० रूपये दर देण्याची घोषणा केली. त्यामुळे निपाणी व चिकोडी तालुक्यातील साखर कारखाने सुरू होण्यास विलंब झाला.
हाल शुगर कारखान्याची नवी मिल सुरू होण्यास विलंब झाल्याने सुरूवातीला २५०० मे.टन गाळप करावे लागले. आता हळूहळू ९ हजार मे.टनाच्या पुढे गाळप होऊ लागले आहे. जैनापूर येथील अरिहंत साखर कारखान्याला देखील मिल मशिनरीचा प्रॉब्लेम झाला. त्यामुळे साखर कारखान्यांना उद्दिष्ट पूर्तीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
हाल शुगरने यावर्षी १० लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावर्षी तोडणी यंत्रणेचे नियोजन चांगले लावण्यात आले आहे. त्यामुळे येणार्या काळात या साखर कारखान्याची गाळप क्षमता जसजशी वाढेल तसे उद्दिष्ट पूर्तीीकडे वाटचाल करावी लागणार आहे. (पुढारी, ०१.१२.२०२५)