धाराशिव ः पाडोळी येथील रूपामाता उद्योग समूहातील रूपामाता नॅचरल शुगर प्रा.लि. युनिट क्रमांक १ येथे गाळप क्षमता विस्तारीकरण फेज २ हा एक ऐतिहासीक दूर दृष्टीपूर्ण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारा औद्योगिक टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे मोळी पूजन व उद्घाटन श्री तुळजाभवानी मंदीर, सिद्धगरीबनाथ मठाचे महंत योगी मावजीनाथ महाराज, हभप. अॅड. पांडुरंग लोमटे महाराज तसेच रूपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अॅड. व्यंकटराव गुंड यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
या विस्तारीकरणामुळे कारखान्याची प्रतिदिन ८०० टन असलेली गाळप क्षमता थेट २ हजार टनांनी वाढून एकूण २८०० टन प्रतिदिन इतकी झाली आहे. यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकर्यांचा ऊस वेळेत पूर्ण क्षमतेने व जलद गतीने गाळप होणार असून आजवर गाळपाविना राहणार्या उसाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. एकाही शेतकर्याचा ऊस शिल्लक राहणार नाही, हा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. (एकमत, २८.०१.२०२६)