काटामारीला बसणार आळा ः प्रत्येक कारखान्यासाठी जिल्हा पातळीवर स्वतंत्र पथके
अंकली ः राज्यातील साखर कारखान्यांमधील वजन काट्यामधील तफावत, काटामारी आणि वजन यंत्रातील बिघाडामुळे साखर उत्पादन आणि उसाच्या वजनात तफावत आढळून येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा पातळीवर आढावा समिती स्थापन करण्यात आली आहे. आता तपासणीसाठी जिल्हास्तरीय आढावा समिती स्थापन केेल्याने याला आळा बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
साखरेेचे उत्पादन आणि उसाचे वजन तपासण्यासाठी प्रत्येक कारखान्यासाठी जिल्हा पातळीवर स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. हे पथक ऊस गाळप हंगामात महिन्यातून किमान दोनदा तपासणी करणार आहे. त्याचा अहवाल साखर संचालनालयाला सादर केला जाणार आहे.
सध्या राज्यातील १७० तालुक्यांमध्ये कृषी विभागाने बसवलेल्या डिजिटल वजन काट्यांवर उसाचे मोफत वजन करण्याची शेतकर्यांना परवानगी आहे. साखर कारखान्यांच्या वजन यंत्रांमधून डिजिटल वजन यंंत्रांमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. संबंधित जिल्हाधिकार्यांना वजन यंत्रांची अचूकता तपासण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वे ब्रिज आणि वजन यंत्रांची तपासणी करण्यासाठी व वजन यंत्रांमधील फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यासाठी साहाय्क नियंत्रक आणि निरिक्षकांसह पथके तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे आता वजन काट्यातील तफावत आणि काटातारीला आळा बसणार आहे.
राज्यातील सर्व साखर कारखान्यांना केंद्र सरकारच्या मालकीची संस्था असलेल्या एनएबीएलकडून साखर उत्पादन चाचणी करून प्रयोगशाळांकडे मान्यता घेण्यासाठी पाठविण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रयोगशाळेत एनएबीएलच्या नियमांनुसार पात्रता निकषांचा अवलंब करावा. राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी या सूचनांचे पालन करावे. त्याचा अहवाल साखर संचालनालयाला सादर करावा, असे सांगण्यात आले आहेत.
वजनकाट्यात होणारी फसवणूक रोखण्यासाठी मागणीनुसार निवडलेल्या ११ ठिकाणी डिजिटल वे-ब्रिज बसवण्याचा प्रस्ताव आहे. ३ ठिकाणी निविदा प्रक्रिया सुरू आहे. ३ ठिकाणी प्रशासकीय मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. - शिवानंद पाटील, ऊस विकास आणि साखर मंत्री (पुढारी, १७.१२.२०२५)