सौरभ शिंदे ः मागील हंगामातील उसाची बिले १५ जूनपूर्वी जमा करणार
कुडाळ ः प्रतापगड सहकारी साखर कारखाना आगामी सन २०२६-२७ चा गाळप हंगाम सहयोगी तत्वावर चालवून यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळ पूर्णपणे प्रयत्नशील आहे. तसेच हंगाम सन २०२५-२६ मधील गाळप झालेल्या उसाची बिले १५ जून पूर्वी शेतकर्यांच्या खात्यात जमा केली जातील, अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी दिली.
श्री. शिंदे यांनी पत्रकात म्हटले आहे की, गेली तीन वर्षे प्रतापगड साखर कारखाना सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्यतारा उद्योग समूहाच्या माध्यमातून कार्यरत होता. मात्र, आगामी सन २०२६-२७ च्या हंगामापासून अजिंक्यतारा साखर कारखाना हा करार सामंजस्याने संपुष्टात आणणार असल्याने प्रतापगड कारखाना मूळ व्यवस्थापनाच्या ताब्यात देत आहे. त्यामुळे आगामी हंगाम यशस्वीरित्या सुरू करण्यासाठी संचालक मंडळाने जाहिरातीद्वारे निविदा मागविल्या होत्या. त्यानुसार मे. गुडगुंटी शुगर्स अॅण्ड बायो एनर्जी प्रा.लि., जमखंडी यांनी कारखान्याकडे आपली निविदा सादर केलेली आहे.
शेतकरी आणि सभासदांच्या हिताचा विचार करून या एजन्सीसोबत संचालक मंडळाची सध्या सकारात्मक चर्चा सुरू आहे. कारखाना नवीन एजन्सीला चालविण्यास देण्यापूवी मागील हंगामातील २०२५-२६ शेतकर्यांची देय असलेली ऊस बिले १५ जूनपूर्वी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी संचालक मंडळ सकारात्मक पावले उचलत असून, शेतकरी बांधवांनी ऊस बिलाबाबत पूर्णपणे निश्चिंत राहावे, असा विश्वास श्री. शिंदे यांनी व्यक्त केला. (सकाळ, ०५.०६.२०२६)