आगामी ऊस गाळप हंगामासाठी कारखान्याकडून धोरण जाहीर
वालचंदनगर ः येथील श्री छत्रपती साखर कारखान्याने सन २०२७-२८ च्या गाळप हंगामाासाठी ऊस लागववड धोरण निश्चित केले असून, १ जुलैपासून ऊस लागवडीसाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली.
१ जुलै २०२६ ते ३१ मार्च २०२७ अखेर या कालावधीमध्ये शेतकर्यांना ऊस लागवड करता येणार आहे. तसेच २०२६-२७ च्या गळीत हंगामामध्ये तोडणी झालेल्या उसाचे खोडवे व निडवे ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. आडसाली उसाच्या हंगामासाठी १ जुलै ते १५ जुलै २०२६ या जातीच्या उसाची लागवड करता येणार आहे.
पूर्व हंगामासाठी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीमध्ये को ८६०३२, एम.एस. १०००१, पीडीएन १५०१२, फुले १५००६, फुले १३००७ या उसाच्या जातीची लागवड करता येणार आहे. सुरू हंगामासाठी १ डिसेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीमध्ये को ८६०३२, एम.एस. १०००१, पीडीएन १५०१२, फुले १३००७, फुले १५००६ या जातीच्या उसाची लागवड करता येणार आहे.
सन २०२६-२७ चा गळीत हंगाम सुरू झाल्यापासून संपेपर्यंत को ८६०३२, एम.एस. १०००१, पीडीएन १५०१२ को एम ०२६५ या जातीच्या उसाचा खोडवा ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ऊस लागण नोंदीचे कामकाजाचे संगणकीकरण केलेले असून सभासदांनी जेवढ्या क्षेत्रावर उसाची लागण केलेली आहे. तेवढ्याच क्षेत्राची कारखान्याकडे नोंदणी करावी. नोंदणी केलेल्या क्षेत्राची पाहणीच्या वेळी लागवड नसल्यास सदरची लागण नोंद रद्द करण्यात येईल. १ जुलै व १६ जुलै २०२६ रोजी ऊस लागण केेलेला नोंद फॉर्म त्या दिवशी सकाळी ७ ते ९.३० वाजेपर्यंत गाववार, विभागवार घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
* शेतकर्यांनी ऊस उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक एआय तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे, तसेच ऊसतोडणी मजुरांचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालल्याने हार्वेस्टर मशिनने ऊसतोडणी करण्यासाठी शेतकर्यांनी ऊस लागवड करताना ४ फूट व ५ फूट सरीची रूंदी ठेवावी व लांब सरीचा पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन छत्रपतीच्या संंचालक मंडळाने केले आहे. (सकाळ, ३०.०५.२०२६)