anekant.news@gmail.com

9960806673

sugar writing news

एआय तंत्रज्ञानाधारे उसाचे दीड एकरात १४२ टन उत्पादन

खुटबाव, ता. दौंड, जि. पुणे येथील महेंद्र थोरात यांनी अभ्यास व सतत ज्ञान घेण्याची वृत्ती यातून आपल्या उसाची एकरी उत्पादकता वाढवली आहे. अलीकडेच बारामती केव्हीके येथील एआय आधारित उसशेतीत प्रयोगात त्यांनीही सहभाग घेतला. त्यांना उताराच्या, पाणी साठलेल्या क्षेत्रात पूर्वी जे एकरी ६५ ते ७० टनांच्या आसपास उत्पादन मिळायचे तेथे एकरी ९४.६६ टन (अंदाजे ९५ टन) उत्पादन मिळाले आहे. पाणी, खते, मजुरी यामधेही लक्षणीय बचत झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात खुटबाव येथे महेंद्र थोरात राहतात. त्यांची जवळच पाटील- निंबाळकर वस्ती अर्थात केडगाव येथेही शेती आहे. स्थापत्य अभियांत्रिकी विषयातून त्यांनी पदविका घेतली आहे. कुटुंबाची ३० ते ३५ एकर शेती आहे. ऊस हे मुख्य पीक आहे. जोडीला केळीसारखे पीक आहे. पोल्ट्रीचा मोठा पूरक व्यवसाय देखील आहे. वडील वयोमानानुसार थकल्यानंतर महेंद्र यांनी २०१८ पासून शेतीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.
ऊस शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी व्यवस्थापनात सुधारणा करण्यास सुरुवात केली. त्यासाठी प्रगतिशील शेतकर्‍यांचे अनुभव व ज्ञान संकलित करण्यास सुरुवात केली. त्यातून दरवर्षी एकरी उत्पादन वाढविण्यास सुरुवात केली. सन २०२१ च्या दरम्यान त्यांनी एकरी १०० टनांच्या आसपास उत्पादनाची मजल गाठली. पुढे बारामती येथील अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट अंतर्गत कृषी विज्ञान केंद्राने सुरू केलेल्या एआय अर्थात कृत्रीम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित ऊसशेती प्रकल्पात सहभाग घेण्याची संधी त्यांना मिळाली. यात एकदिवसीय प्रत्यक्ष ठिकाणी तसेच ऑनलाइन पद्धतीने पुढेही एआय तंत्रज्ञानासंबंधीचे प्रशिक्षण मिळाले.
एआय आधारित ऊस शेतीत सहभाग - महेंद्र यांच्या एकूण ऊस शेतीपैकी काही जमीन थोडी उताराची आहे. ज्यात पाणी साठून राहायचे. अशा जमिनीत व्यवस्थापन करणे व चांगले उत्पादन घेणे आव्हानाचे होते. याच जमिनीची निवड एआय ऊस शेती प्रकल्पासाठी महेंद्र यांनी केली. या जमिनीत एकरी ६५ ते ७० टन उत्पादन त्यांना मिळायचे. प्रकल्पातील प्रयोग सुरू करण्यापूर्वी त्यांच्या जमिनीचे माती परीक्षण करण्यात आले.जमिनीचे डिजिटल नकाशे तयार करण्यात आले. जुलै २०२४ मध्ये रोपांची लागवड साडेचार बाय दोन फूट अंतरावर केली. दोन एकरांपैकी एका एकरात आपल्याकडील रोपांची तर उर्वरित दुसर्‍या एकरात केव्हीकेकडील रोपांचा वापर केला. केव्हीकेच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आजपर्यंतच्या अनुभवानुसार खते व पाणी यांचा वापर केला. माती परीक्षणामुळे जमिनीला असलेली अन्नद्रव्यांची नेमकी गरज लक्षात आली. रासायनिक खतांचा अतिरेक टाळला. शेतात स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणीही केव्हीकेच्या मदतीने करण्यात आली.एआय प्रणालीत मातीत खोलवर सात इंचावर व १४ इंचावर असे दोन सेन्सर्स लावण्यात आले. पाण्याचा वापर आठवड्यातून दोन ते तीन वेळा गरजेनुसार व काटेकोर पद्धतीने केला. एआय तंत्रज्ञान प्रणालीत पाणी वापराचे ‘मोबाईल मेसेज’ येत होते. ठिबक व सौरपंप यांचा यांचा योग्य वापर करून पाण्याची बचत साधली. जैविक खतांचा उपयोग करून जमिनीची सुपीकता टिकविण्यास प्राधान्य दिले त्यासाठी शेणखत, हिरवळीची खते यांचा वापर केला. जमिनीवर उसाच्या पाचटाचे आच्छादन केले. त्यामुळे मातीतील ओलावा टिकला. तणाचा प्रादुर्भाव कमी झाला. - महेंद्र थोरात ९८९०८०५५१२
एआय’मुळे उसाचेशाश्वत उत्पादन
कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथील शास्त्रज्ञ डॉ. विवेक भोईटे म्हणाले, की आमच्या केंद्राने ऑक्स्फर्ड, मायक्रोसॉप्ट आदी जगातील दिग्गज संस्थांसोबत एआय ऊस शेती तंत्रज्ञानाचा प्रकल्प सुरू केला. राज्यातील तब्बल एकहजार शेतकर्‍यांकडे त्याचे प्रयोग झाले. या सर्व शेतकर्‍यांकडील प्रयोगांचे निष्कर्ष असे आहेत, की त्यांच्या शेतात पाणी व खतांची मोठी बचत झाली रासायनिक खतांचा अपव्यय झाला नाही.सेंद्रिय कर्ब टिकून राहिला. खतांचा संतुलित वापर झाल्याने पर्यावरणात त्यांचे प्रदूषण झाले नाही. या सर्व फायद्यांव्यतिरिक्त एकरी ऊस उत्पादनातही लक्षणीय व शाश्वत वाढ झाली आहे. महेंद्र थोरात यांनीही अशाच नियोजनातून घेतलेले उत्पादन प्रशंसनीय आहे. साखर कारखाने व कृषी विभागाने जास्तीत जास्त पुढाकार घेऊन प्रकल्पात सहभागी व्हावे. शेतकर्‍यांसाठी एआयचे प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू आहे. - डॉ. विवेक भोईटे ७७२००८९१७७
एआय प्रणालीचे फायदे
* पाणी, खते व कीडनाशके यांचा अचूक वापर
* हवामानातील बदलाचा योग्य अंदाज
* रोग व कीड ओळखून प्रतिबंधात्मक उपाय सुचविणे
* मजुरीवरील अवलंबित्व कमी करणे
* उत्पादन व गुणवत्तेत सातत्यपूर्ण वाढ
*पर्यावरणीय प्रभाव कमी करणे
एआय प्रणाली कशी काम करते?
एआय प्रणाली शेतातील सेन्सर्सद्वारे मृदा तापमान, ओलावा, सूर्यप्रकाश, हवामानाचे अन्य घटक, पिकांची वाढ, स्थिती, रोग-कीड आदींचा प्रादुर्भाव आदी सर्व डेटा संकलित करते. त्याचे विश्लेषण केव्हीकेतील शास्त्रज्ञांकडून केले जाते. संबंधित शेतकर्‍यांना मोबाइल अ‍ॅपद्वारे निर्णय सुचवण्यात येतात. त्यानुसार पिकाच्या कोणत्या अवस्थेत किती पाणी द्यायचे, कोणते खत किती प्रमाणात वापरायचे, कीडनाशक फवारणी कधी करायची आदी सल्ले देण्यात येतात. परिणामी, शेतीचे व्यवस्थापन अचूक, जलद व अधिक उत्पादनक्षम बनते.
साध्य झालेले उत्पादन - महेंद्र यांनी को ८६०३२ या जातीची लागवड केली आहे. त्यांना सुमारे दोन एकर प्रयोगातील क्षेत्रापैकी अर्धा एकर क्षेत्रातील उसाचा वापर बेण्यासाठी केला. उर्वरित म्हणजे दीड एकरांत त्यांना १४२ टन म्हणजे एकरी ९४. ६६ टन (अंदाजे ९५ टन) उत्पादन मिळाले. पेर्‍यांची संख्या प्रति ऊस सरासरी ४२ च्या आसपास होती. अनेक शेतकर्‍यांनी महेंद्र यांच्या शेताला भेट देऊन त्यांचे व्यवस्थापन समजून घेतले आहे. वडील तुकाराम व चुलते पोपटराव यांनी मार्गदर्शन त्यांना सतत लाभले आहे. ठिबक सिंचनाचा वापर राज्यात सुरू झाल्याच्या काळापासून थोरात यांच्या शेतात त्याचा वापर सुरू आहे. (अ‍ॅग्रोवन, २८.०१.२०२६)